Ayushman Bharat Mission Maharashtra Committee : राज्य सरकारकडून ‘आयुष्यमान भारत, मिशन महाराष्ट्र’ समितीचे पुर्नगठन करण्यात आलं असून डॉ. ओमप्रकाश शेटे […]
Ayushman Bharat Mission Maharashtra Committee : राज्य सरकारकडून ‘आयुष्यमान भारत, मिशन महाराष्ट्र’ समितीचे पुर्नगठन करण्यात आलं असून डॉ. ओमप्रकाश शेटे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या या समितीमध्ये शेटेंसह सहा सदस्यांचा समावेश आहे. राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले आहेत.
केंद्राच्या आयुष्यमान भारत (Ayushman Bharat Yojana) आणि राज्याच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana) या दोन्ही योजनेंच्या सुविधा योग्य पद्धतीने गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी या समितीची नेमणूक करण्यात आली आहे. राज्यातील गरजू नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, तसेच महागड्या शस्त्रक्रिया या योजनेच्या माध्यमातून करता याव्यात यासाठी ही समिती प्रयत्न करणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2014-2019 दरम्यान असताना डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीची जबाबदारी होती. त्यावेळी राज्यातल्या गरजू लोकांपर्यंत मदत जास्तीत जास्त कशी पोहोचवता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता. त्यांच्या या कामाचं कौतुकही मोठ्या प्रमाणात झालं होतं. त्यानंतर डॉ. ओमप्रकाश शेटे हे तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचे ओएसडी बनले. राज्यात आता महायुतीचं सरकार आल्यानंतर त्यांच्याकडे पुन्हा एकदा मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
या समितीमध्ये कोण सदस्य?
- ओमप्रकाश शेटे, अध्यक्ष
- सचिव – राज्य आरोग्य हमी सोसायटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी
- वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक
- आरोग्य विभागाचे सहसंचालक
- राज्य हमी सोसायटीचे सहाय्यक संचालक
- वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दोन तज्ज्ञ
आयुष्यमान भारत योजनेचा फायदा कुणाला?
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत सहभागी होण्यासाठी विविध अटी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. सन 2011 च्या “सामाजिक, आर्थिक आणि जात आधारित जनगणनेतील” पात्र कुटुंब, अन्नसुरक्षा योजनेच्या अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य गटातील कुटुंब यांना लाभ मिळेल. याशिवाय ही योजना केंद्र सरकार पुरस्कृत असून या योजनेमधील महाराष्ट्रातील पात्र लाभार्थी राज्यात तसेच देशातील इतर राज्यात लाभ घेऊ शकतात.
या योजनेअंतर्गत वैद्यकीय उपचारांकरिता प्रति वर्ष / प्रति कुटुंब 5 लाख रुपयांपर्यंत पर्यंत मोफत आरोग्य विमा मिळेल. आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी आधार कार्ड द्वारे केवायसी करून आयुष्मान भारत योजनेचे कार्ड तयार करणे आवश्यक आहे. आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही योजनेशी अंगीकृत रुग्णालयात नियुक्त ‘आरोग्य मित्र’ आणि हेल्पलाईन क्र. 14555/1800111 565 शी संपर्क करु शकता.