नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष शस्त्रसंधीमुळं थांबला आहे. भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. ऑपरेशन सिंदूर द्वारे भारत सरकारनं दहशतवाद्याच्या 9 ठिकाणांना उद्धवस्त केलं होतं. यामुळं बिथरलेल्या पाकिस्तानी लष्कारनं भारतीय लष्करी तळांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. भारतानं पाकिस्तानचे हल्ले परतावून लावले होते. या संघर्षाच्या काळात तुर्कीनं पाकिस्तानच्या बाजूनं भूमिका घेतली होती. यामुळं भारतात तुर्कीवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरु झाली आहे. तुर्कीमध्ये जे लोक पर्यटनासाठी जाणार होते, त्यांनी तिकिटं रद्द केलेत. तुर्कीसोबतचा व्यापार देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दरम्यान एअर इंडियानं स्पर्धक कंपनी इंडिगोचा एक करार थांबवण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे धाव घेतली आहे. यावर इंडिगोनं देखील त्यांची भूमिका मांडली आहे.
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार एअर इंडियानं भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या काळात तुर्कीनं पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. यामुळं निर्माण झालेल्या व्यापारी आणि सुरक्षेच्या संदर्भातील प्रश्नांचा दाखला देत एअर इंडियानं इंडिगो आणि टर्किश एअरलाईन्स लीजिंग टाय अप रोखण्याचं आवाहन केलं आहे.
एअर इंडियाची भूमिका
एअर इंडियानं भारताच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे इंडिगो आणि टर्किश एअरलाईन्सच्या कराराला वारंवार मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थगित करावा, अशी मागणी केली आहे. इंडिगो आणि टर्किश एअरलाईन्सच्या कराराचं दर सहा महिन्यानं नुतनीकरण केलं जातं. एअर इंडियाच्या दाव्यानुसार या कराराचा फायदा तुर्कीला होत असून भारताच्या विमान कंपन्यांना नुकसान होत आहे. रॉयटर्सनुसार भारताच्या सरकारी विभागांना पाठवलेल्या कागदपत्रांनुसार विमानं भाडेतत्त्वावर देण्याच्या व्यवस्थेनं तुर्कीसाठी जाण्यासाठी अधिक आसनं उपलब्ध होतात. ज्यामुळं त्या देशाच्या पर्यटनाला चालना मिळतेय.
इंडिगोची भूमिका काय?
इंडिगोनं त्यांची भूमिका यापूर्वीच मांडली आहे. टर्किश एअरलाईन्ससोबतच्या करारामुळं भारतीय प्रवाशांना आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला अनेक फायदे मिळतात असं, इंडिगोनं सांगितलं आहे. यामुळं कनेक्टिविटी चांगली झालेली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास किफायतशीर झालेला आहे, असं इंडिगोचं मत आहे. पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार इंडिगोच्या एका अधिकाऱ्याच्या मते भारत आणि तुर्की यांच्यातील हवाई वाहतूक द्वीपक्षीय हवाई सेवा कराराचा भाग आणि भारताचा आंतरराष्ट्रीय हवाई सेवांच्या समग्र निर्माणाच्या संदर्भात पाहिलं पाहिजे.
एएसए नुसार तुर्की आणि भारताच्या एअरलाईन्समध्ये एका आठवड्यात 56 उड्डाणं करण्याची परवानगी मिळाली आहे. भारतीय विमान कंपन्यांना भारत ते तुर्की आणि तुर्की ते भारत 14-14 उड्डाणं संचलित करण्याची परवानगी मिळाली आहे. तुर्कीची विमान कंपनी देखील अशाच प्रकारे सेवा देते. इंडिगोच्या मते टर्किश एअरलाइन्सच्या सोबत भागीदारी केल्यानं भारतीय प्रवाशांना लाभ होतो. अधिक अंतराच्या प्रवासासाठी अतिरिक्त क्षमतेमुळं भारतीय प्रवाशांना किफायतशीर दरात आसनं उपलब्ध होतात.